Monday, November 9, 2009

उच्चवर्णीयांच्या साहित्यात मराठा स्त्रीचे हास्यास्पद चित्रण
मराठा साहित्य संमेलनाच्या चर्चासत्रात आरोप
नागपूर, २३ मे/ प्रतिनिधी

मराठा स्त्रीच्या भावविश्वाचे प्रतिबिंब उच्चवर्णीय स्त्रियांच्या लेखनात उद्धृत झाले नसून



उच्चवर्णीय लेखकांनी मराठा स्त्रीचे हास्यास्पद रेखाटन केले असल्याचा आरोप अ.भा. मराठा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात करण्यात आला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यातील मराठा स्त्री’ या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उषा बोहरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंदा राऊत, बुलढाण्याच्या स्मिता देशमुख, यवतमाळच्या डॉ. छाया महाले आणि लातूरचे तानाजी जाधव होते.
महाले म्हणाल्या, उच्चवर्णीय स्त्रिया लिहायला लागल्यानंतर त्यांचे प्रश्न साहित्यात प्रतिबिंबित झाले. पतीव्रता स्त्रीला आदर्श मानून त्यासाठी पुराणातील सावित्री, सत्यभामा, गांधारी, कुंती या स्त्रियांचा उदोउदो करण्यात आला. मात्र त्यात मराठा स्त्रीचे भावजीवन आले नाही. शोषण, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मराठा स्त्रीच्या हाती शिक्षण हे मोठे शस्त्र दिले. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे मोठेपण सांगणारे साहित्य त्यावेळी निर्माण केले. इंदिरा तेलंग आणि सीताबाई गोडस या मराठा समाजातील स्त्रियांनी पारंपरिक लेखनापेक्षा वेगळी वाट चोखाळली. अलीकडच्या काळात प्रतिमा इंगोले, मलिका अमर शेख आणि रजनी परुळेकर यांनी स्त्रीचे वास्तव चित्र रेखाटल्याचे महाले म्हणाल्या.
तानाजी जाधव म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी साहित्याचा विषय देवी, देवता, कुणी राजा यांच्यापासून सुरु होत असे. हळूहळू शिक्षणामुळे मराठा समाजाला आलेल्या आत्मभानातून ग्रामीण साहित्यातून मराठा स्त्रीचे प्रतिबिंब दिसू लागले. त्यांनी डॉ. रा.रं. बोराडे, डॉ. मथू सावंत यांच्या साहित्यकृतींचा यावेळी धांडोळा घेतला. शिवधर्माचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रयत्नांमुळे मराठा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवधर्म स्वीकारला मात्र, त्यांच्या अर्धागिनी वैदिक धर्मातील कर्मकांड पाळतात. आजही मराठा स्त्री वैदिक गुलामगिरीतून बाहेर येऊ शकली नसल्याचे तानाजी जाधव यांनी ठासून सांगितले. स्मिता देशमुख यांनी मराठा समाजाने वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले म्हणाल्या, श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व देणे ही मराठा समाजाची खासियत आहे. लोकसाहित्यात मराठा स्त्रीचे चित्रण आले असून यमी आणि रुक्मिणी या पुराणातील स्त्रियांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. उच्चवर्णीयांच्या लेखनात मराठा स्त्रीचे चित्रण आले नसून जे काही थोडेफार लेखन झाले आहे ते हास्यास्पद आणि विनोदाच्या अंगाने आल्याचा तानाजी जाधव यांच्या आरोपाचे प्रतिमा इंगोले यांनीही समर्थन केले. ऐतिहासिक साहित्य आणि आत्मचरित्रामध्ये मराठा स्त्रीच्या चित्रणाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. संचालन रंजना चौधरी यांनी केले, तर प्रतिभा सावंत यांनी आभार मानले.

‘तुकाराम महाराजांचे विचार सार्वकालिक’
नागपूर, २३ मे/प्रतिनिधी

नवीन पिढी कितीही पुढे गेली, आधुनिक झाली तरी, तुकाराम महाराजांचे विचार


सार्वकालिक आहेत हे वास्तव विसरता येण्यासारखे नाही, असा सूर पाचव्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनातील पहिल्या सत्रात उमटला.
मराठा सेवा संघप्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित या संमेलनातील पहिल्या सत्राचा विषय ‘सार्वकालीन संत तुकाराम महाराज’ हा होता. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ शहरातील इतिहास संशोधक व विचारवंत प्रा. अशोक राणा होते. यावेळी वक्ते म्हणून गोव्यातील गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ नाईक उपस्थित होते. व्यासपीठावर अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे, श्री गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वर रक्षक, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद माने, सिटिझन फोरमचे संयोजक डॉ. अशोक येंडे उपस्थित होते.
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा प्रभाव तुकाराम महाराजांवर होता. म्हणूनच शांती आणि सत्यावर तुकाराम महाराजांची अतिनिष्ठा होती. असत्याची चीड आली पाहिजे पण, त्याचबरोबर सत्य मांडताना प्राण अर्पण करायची तयारीही ठेवायला पाहिजे. संत तुकोबारायांचा हाच विचार प्रत्येकाने अंमलात आणावा, असे मत प्रा. अशोक राणा यांनी चर्चासत्रात मांडले. तुकोबारायांच्या अभंगातील स्वाभाविकपणा मांडताना प्रा. राणा यांनी यावेळी तुकाराम महाराजांनी रचलेले अनेक अभंग सादर केले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून नेहमीच संदेश दिला फक्त घेणाऱ्यांना तो घेता आला पाहिजे हे सांगताना त्यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. तुकोबारायांचे वास्तव्य ज्या परिसरात होते त्याच परिसरात शिवरायांचे कार्य बहरले हे प्रा. राणा यांनी आवर्जून सांगितले.
तुकाराम महाराजांनी सामान्य माणसांची उदाहरणे देऊन वैश्विक तत्त्वज्ञान जगासमोर मांडले आणि म्हणूनच ते सार्वकालीन ठरले, असे मत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी मांडले. तुकाराम महाराजांबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जातात. कुणी त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या असे म्हणतात तर, कुणी त्या जाळल्या गेल्या, असे म्हणतात पण, सत्य काय ते कुणालाही माहीत नाही, असे रामनाथ नाईक म्हणाले. संत तुकाराम महाराज सर्वकालीन तर आहेच पण, ते सर्वव्यापीसुद्धा आहेत, असेही नाईक यावेळी म्हणाले. चर्चासत्राचे संचालन माधवी शिंदे यांनी केले. ज्योती मोहरकर यांनी आभार मानले.

समाजाला निकोप साहित्याची गरज - ऍड. खेडेकर
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM

नागपूर - देशपांडे हॉल अखिल भारतीय मराठा समाज साहित्य संमेलनात उपस्थितांची भव्य गर्दी.

नागपूर - साहित्यामध्ये समाजाला बदलविण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्यिकांनी समाज घडविणारे निकोप लेखन करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. दोन दिवस चाललेल्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचा आज सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्‍त केले.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, अमेरिकेचे विचारवंत डॉ. थॉम वोल्फ, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके,
बाळासाहेब लुंगे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, प्रा. जैमिनी कडू, नितीन सरदार, ज्येष्ठ सत्यशोधक व माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, डॉ. साहेबराव खंदारे, सुमतीदेवी धनवटे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक धवड, आमदार दीनानाथ पडोळे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम कडू, अनंतदादा चोंदे, विजयकुमार ठुबे, मधुकर मेहकरे आदी उपस्थित होते.
परखड भाषणात ऍड. खेडेकर म्हणाले, जगातील ५८ देशांना तुकाराम माहिती आहे; परंतु आमच्या भारतीयांना तो अजूनपर्यंत समजला नाही. तुकाराम व महात्मा फुले यांच्या विचारांवर अमेरिका व युरोपमध्ये क्रांती होते. तुकारामांचे साहित्य थोर आहे; परंतु फारच कमी घरांमध्ये त्यांचे ग्रंथ आढळतात, ग्रंथ असले तरीही ते आम्ही समजून घेतले नाहीत. त्यांच्या साहित्यावर आज चिंतनाची खरी गरज आहे. संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस चिंतन झाले, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविले गेले. हीच संमेलनाची खरी फलश्रुती होय.
ऍड. खेडेकर यांनी साहित्यासोबतच आजच्या पत्रकारितेवरही ताशेरे ओढले. पत्रकारांनी भान ठेवून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी तोंडसुख घेतले. अमेरिका व युरोपसारखे देश संघाला पोसत असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. वोल्फ यांनी आपल्या भाषणातून नागपूरकरांना महात्मा फुले यांचे विचार समजावून सांगितले. समाजक्रांती घडविणारे म. फुले विदेशातील लोकांना फारसे माहिती नाहीत, याचा खेद वाटतो. फुले सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या व सरळ भाषेत हृदयातील भाषा बोलले. फुलेंना सामाजिक क्रांतीचा जनक संबोधत ते म्हणाले, बहुजनांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुलींच्या उत्थानासाठी ते लढले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची आज आवश्‍यकता आहे.
महाकवी गायधनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, तुकाराम जगाला माहिती झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले, अभ्यास झाला. फुले, गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांना विदेशातील अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली.
यावेळी प्रा. सुधाकर मोहोड, प्रा. कडू, सुमतीताई धनवटे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. वोल्फ, प्रा. पुरके, अशोक धवड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. जैमिनी कडू यांनी सत्काराला उत्तर दिले. संचालन प्रा. मीनाश्री पावडे यांनी केले.
--------------------------------
पुरंदरेंना हटवा

मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडीचा प्रस्ताव आहे. त्याचा विरोध करण्याचा प्रस्ताव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला.
--------------------------------
मराठा साहित्याद्वारे इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे - श्रीमंत कोकाटे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लेखकांनी आतापर्यंतचा इतिहास विकृतपणे मांडला आहे. तो इतिहास मराठा साहित्याच्या माध्यमातून पुनर्लिखित करीत नव्याने मांडावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
मराठा सेवा संघप्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या सत्रात "मराठा साहित्याची भूमिका' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते गंगाधर बनबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून "प्रतिइतिहास'कार इंजि. चंद्रशेखर शिखरे, मनपाचे विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे-पाटील, भारतीय सेवा मंडळाचे राम आकरे उपस्थित होते. कोकाटे म्हणाले, "मराठी साहित्य हे केवळ पु. ल. देशपांडे, अत्रे व खांडेकरांचे साहित्य आहे. संत तुकारामाचे साहित्य हे मराठा साहित्य आहे. अलीकडे त्यात. मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा यांच्या साहित्याची भर पडली आहे. मराठा आणि ब्राह्मणी साहित्याची तुलना करताना ब्राह्मणी साहित्याने शिवाजी महाराजांचा संघर्ष धार्मिक संघर्ष म्हणून मांडला. मात्र, तो संघर्ष धार्मिक नसून राजकीय संघर्ष होता. याशिवाय संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न साहित्यात करण्यात आला. यातून पसरणारे विचार आपल्या मुलांना शिक्षणसत्ता आणि अर्थसत्तेपासून दूर ठेवण्याचे षड्‌यंत्र आहे. याविरुद्ध संघर्ष न केल्यास बहुजनांचे ब्राह्मणीकरण होईल.
मराठा साहित्यात समतेची व विश्‍वव्यापकतेची भूमिका आहे. ती भूमिका जगासमोर आणण्यासाठी इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची गरज आहे. जो इतिहास विसरतो, तो इतिहास लिहू शकत नाही, तेव्हा आजच्या पिढीने तो विसरता कामा नये. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अधिकाअधिक संशोधनात्मक, ललित, नाटक, कादंबरी, कविता यासारख्या साहित्याची निर्मिती करीत तुकाराम महाराजांची प्रतिमा उदात्त करावी, असे आवाहन त्यांनी केले. बनबरे म्हणाले, "मराठा साहित्य हे एका जातीला प्रेरक असे साहित्य नाही. ते सर्वांना प्रेरक आहे. या तुलनेत मराठी साहित्य संकुचित स्वरूपाचे आहे. आज भाषेचा दहशतवाद डोक्‍यात पसरविण्यात येत असून, तो डोक्‍यात शिरू न देता नवे प्रश्‍न नव्या भूमिका ठेवा. आजही आम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा, अशी शाहू-फुलेंची मागणी करतो. हा त्यांचा विचारांचा पराभव आहे. यावेळी इंजि. चंद्रशेखर शिखरे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन रजनी डहाके यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
..............
परस्परांना समजून घेतल्यानेच जीवनप्रवास सुखी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - भिन्न स्वभाव, कार्यक्षेत्रही वेगळे, त्याही परिस्थितीत सामाजिक बांधिलकी व संसाराला सांभाळत, आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या खेडेकर दाम्पत्याने जीवनपट उलगडवून दाखविला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "आमचे जीवनगाणे' या प्रगट मुलाखतीतून त्यांनी सुखी व यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर व त्यांच्या अर्धांगिनी चिखलीच्या आमदार रेखाताई खेडेकर यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्‍याम मानव यांनी प्रगट मुलाखत घेतली. दीड तासांच्या या मुलाखतीदरम्यान खेडेकर दाम्पत्याने सामाजिक कार्यापासून ते खासगी आयुष्यातील सर्व गुपिते उपस्थितांसमोर उघड सुखी आयुष्याचे गमक सांगितले. एकमेकांप्रती विश्‍वास, प्रेम, आदर, करुणा, माया, समजूतदारपणा इत्यादी गुणांमुळेच दोघेही संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
श्‍याम मानव यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नांचे उत्तर त्यांनी आत्मविश्‍वासाने दिले. लग्न का केले, त्यामागचा उद्देश काय, पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून असलेल्या अपेक्षा इ. सांगताना त्यांनी आयुष्यातील छोटे छोटे किस्से सांगितले. आग ओकणाऱ्या व नेहमी शिवीगाळ करणाऱ्या कठोर हृदयाच्या व्यक्‍तीसोबत संसार करताना कधीही त्रास गेला नसल्याचे रेखाताईंनी सांगितले. पती रागात असेल तर पत्नीने बोलू नये आणि पत्नीचा पारा वर असेल, तर पतीने काहीही बोलू नये; असे वागले तर संसारात वादळ निर्माण होत नाही, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझे पती अनेकांना कठोर व आक्रमक वाटत असले, तरी मनाने खूप चांगले आहेत. अत्यंत भावनाशील व संवेदनशील असा हा माणूस आहे, हे माझे भाग्य आहे. या माणसाने आपल्याला प्रेमच दिले नाही, तर पावलोपावली समजून घेतले, असे उच्च शिक्षित रेखाताईंनी सांगितले. खेडेकरांनीही बायकोचे म्हणणे ऐकल्याने संसार सुखी होतो, अशी कबुली दिली.
रेखाताईंचा राजकारणातील प्रवेशाचा निर्णय कुटुंबातील सर्व सदस्यांनी सर्वानुमते घेतल्याचे सांगून खेडेकर म्हणाले, पत्नी आमदार बनल्यानंतरही आमच्यातील प्रेम कमी झाले नाही, उलट जबाबदारीनेच वागलो. दोघांनीही एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. एखादा कटू प्रसंग आलाच तर चर्चेच्या माध्यमातून सोडविला. संयुक्‍त कुटुंब असल्याने तिन्ही मुलांवर चांगले संस्कार झाले. बायको मिळणे कठीण असते, याची मला जाण होती. त्यामुळेच मी पत्नीला जीवापाड वागविले. तिने मला पसंत केले नसते, तर कदाचित मला रामदासांप्रमाणे अविवाहित राहावे लागले असते, असे ते मिस्किलपणे म्हणाले. या मुलाखतीच्या निमित्ताने दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवले.
यावेळी व्यासपीठावर प्रभाकरराव देशमुख व प्रिया देशमुख, रमेश बोरकुटे, लक्ष्मणराव बोदडे व इंदिरा बोदडे, अजय पाटील व प्रगती पाटील आणि मधुकर मेहकरे व श्रीमती मेहकरे उपस्थित होते.
अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाला नख लावू नका - गायधनी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 23rd, 2009 AT 10:05 PM

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह - पाचव्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना, संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव, बाळासाहेब लुंगे, आमदार रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, डॉ. साहेबराव खंदारे व इतर मान्यवर. (सकाळ छायाचित्रसेवा)

नागपूर - लेखक किंवा साहित्यिकाने अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाला नख लावणारे लेखन करु नये, अशी प्रतिक्रिया पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्‍त करीत डॉ. आनंद यादव यांच्या लेखनाचा समाचार घेतला. साहित्य केवळ वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी किंवा वाद निर्माण करण्यासाठी नव्हे, तर वास्तववादाला हात घालून समाजाला दिशा दाखविणारे असावे, अशी अपेक्षा त्यांनी बहूजन लेखकांकडून व्यक्‍त केली.
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते शनिवारी थाटात उद्‌घाटन झाले. विचारपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, चिखलीच्या आमदार रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर विभागाच्या सहआयुक्‍त पल्लवी दराडे, चौथ्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेबराव खंदारे, मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ठुबे, संभाजी ब्रिगेडचे अनंतदादा चोंदे, देवानंद कापसे, नितिन सरदार, पुरुषोत्तम कडू, इतिहासकार मा. म. देशमुख, सुमतीताई धनवटे, टी. टी. ठाकरे, विजयकुमार शिंदे, विभागीय अध्यक्ष मधूकर मेहकरे, शारदा देशमुख आदी उपस्थित होते.
महाकवी गायधनी म्हणाले, आज साहित्यिकांना सत्य दिसत नाही ही खेदाची बाब आहे. त्यांना जबाबदारीची जाणीव होईल, तेव्हाच खऱ्याअर्थाने समाज परिवर्तन घडेल. कारण साहित्यिकांमध्ये समाजातील प्रत्येक वाईट गोष्टी बदलविण्याची ताकद आहे.
मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करीत
श्री. गायधनी म्हणाले, मराठा समाज मनाने उदार आहे. म्हणूनच त्यांनी सर्वांना आपले मानून जवळ केले. या समाजाने जाती, पंथ किंवा धर्माला चिकटून राहण्याचा संकुचितपणा कधीही दाखविला नाही. दलितांनी एकसंघ राहून आपला विकास करवून घेतला. मराठा समाजानेही त्यांच्यापासून धडा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. गायधनी यांनी इतरही विषयांना हात घातला. त्यांनी शालेय अभ्यासक्रमात तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्याचे शिकविले जात असल्याबद्‌दल आश्‍चर्य व्यक्‍त करीत, अभ्यासक्रमातून ते काढून टाकण्याची मागणी केली. नागपूर विद्‌यापीठाबद्‌दल उच्चारण्यात येणाऱ्या "आरटीएम' किंवा "रातुम' या शब्दांवरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी आपल्या विवेचनपूर्ण भाषणात बुवाबाजीवरही टिका केली. जगात कोणतीही दैवी शक्‍ती नसल्याचे सांगून, महिलांना आसारामबापूंसारख्या बुवांकडे न जाण्याची विनंती केली. बोलीभाषेत मोठे सामर्थ्य असल्याचे सांगून, त्यांनी राज्यात बोलीभाषा विद्‌यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली.
संमेलनाचे उद्‌घाटक शिवराज महाराजांनी परखड मत व्यक्‍त करीत, दैनंदिन जीवनात घडणारे अनेक किस्से ऐकविले. त्यांच्या भाषणाने सर्वाधिक टाळ्या तर घेतल्याच, शिवाय साहित्यासारख्या जड विषयाने गंभीर झालेल्या वातावरणात हास्यही फुलविले. या निमित्ताने मराठा समाजाला संत तुकारामांची आठवण होणे व राज्यातील समाजबांधव एकत्र येणे, हे संमेलनाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. पैशाच्या मागे लागलेल्या आजच्या ढोंगी साधुसंतांवरही त्यांनी प्रहार केला. संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर हेच खरे संत असून, त्यांची शिकवण आत्मसात करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
डॉ. खंदारे यांनी मराठी साहित्य व मराठा साहित्य यातील फरक सांगून, मराठी ही प्रशासनाची भाषा व्हावी अशी इच्छा व्यक्‍त केली. वाङमयाची निर्मिती साहित्याचा शोध घेण्यासाठी झाली असून, अशाप्रकारची संमेलने त्यादिशेने महत्वाचे पाऊल ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. बाळासाहेब लुंगे यांनी साहित्यिकांना प्रामाणिक व निकोप राहून लेखन करण्याचा सल्ला दिला. प्रामाणिक नसलेल्या लेखकांचे साहित्य फसवे असते, असे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ना. गो. थुटे, प्रा. अशोक राणा आणि दिलीप धापके यांच्याही पुस्तकाचे प्रकाशन झाले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक विजयकुमार शिंदे यांनी केले. संचालन लिना निकम व विजया मारोतकर यांनी केले, आभार सुरेखा कापसे यांनी मानले. डॉ. विजया कोकाटे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. कार्यक्रमाला गंगाधरराव पन्नासे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्ञानेश्‍वर रक्षक, दादासाहेब ठाकरे, प्रा. प्रभाकर पावडे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
मराठा साहित्य संमेलन २३ पासून
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 07th, 2009 AT 10:05 PM
नागपूर - मराठा सेवा संघ प्रणित जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे पाचवे मराठा साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक विजयकुमार शिंदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार,(ता.22) सायंकाळी 6 वाजता महाराजबाग येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळयापासून जगद्‌गुरू तुकोबाराय चतुर्थ जन्मशताब्दीनिमित्त मिरवणूक व ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचा समारोप रात्री 9.30 वाजता डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे होईल.
शनिवार,(ता.23) सकाळी 9 वाजता संमेलनाचे उद्‌घाटन शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सुधाकर गायधनी राहतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, पुरूषोत्तम खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, नेताजी गोरे, विजयकुमार ठुबे, जयश्री शेळके, अंनतदादा चोंदे, देवानंद कापसे, सुनील सरदार, पुरूषोत्तम कडू, मधुकर मेहकरे उपस्थित राहतील.
दुपारी 2 वाजता सार्वकालीक संत तुकाराम महाराज या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5 वाजता साहित्यातील मराठा स्त्री यावर वक्‍ते विचार व्यक्‍त करतील. रात्री 8 वाजता शिवशब्द गजर हे कवीसंमेलन होईल. रविवार, (ता.24) सकाळी 9 वाजता वाचकांच्या साहित्याकडून अपेक्षा तर सकाळी 11 वाजता मराठा साहित्याची भूमीका या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 3 वाजता आमचे जीवनगाणे : शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर आणि शिवमती रेखा खेडेकर यांची प्रगट मुलाखत होईल. सायंकाळी 5 वाजता सुधाकर गायधनी यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सुधाकर मोहोड, प्रशांत कोहळे, अभिजित दळवी आदी उपस्थित होते.

नागपूर - जय शिवाजी व जय जिजाऊचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात असंख्य आकर्षक चित्ररथांचा समावेश असलेल्या मिरवणूक व ग्रंथदिंडीने आज मध्य नागपूर दुमदुमले. मराठा साहित्य समंलेनाच्या पूर्वसंध्येला जगदगुरू तुकोबारायांच्या चतुर्थ जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी काढण्यात आलेल्या या दिंडीत लहानथोरांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
ग्रंथदिंडीची सुरुवात महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून झाली. तत्पूर्वी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी डॉ. देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीची पूजा केली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, विभागीय अध्यक्ष मधुककराव मेहकरे, कॉंग्रेसचे माजी नेते मुकुंदराव पन्नासे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्‍वर रक्षक, रमेश बोरकुटे, चंद्रशेखर चांदेकर, संजय शेंडे, प्रदीप शेंडे, डॉ. शांतिदास लुंगे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी झेंडा चौक (धरमपेठ), लक्ष्मी भवन चौक, शंकरनगर, सिमेंट रोड, रामनगर, गोकुलपेठ, लॉ कॉलेज चौकमार्गे जाऊन डॉ. देशपांडे सभागृहात समारोप झाला. दिंडीत संत तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंके, मा. म. देशमुख, जैमिनी कडू यांच्यासह अनेक प्रसिद्ध लेखकांचे जवळपास दीडशे ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीत बाल शिवाजी, जिजाऊ, तुकारामांची वेशभूषा असलेले कलाकार, भजन मंडळ, लेझीम पथकासह सहा आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच शाळकरी मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता.
आज मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने पाचवे मराठा साहित्य संमेलन उद्या (ता. 23) पासून डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद महाकवी सुधाकर गायधनी भुषवणार असून, उद्‌घाटन पंढरपूरच्या कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब लुंगे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श. नू. पठाण, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
उद्‌घाटनानंतर सार्वकालीक संत तुकाराम महाराज आणि साहित्यातील मराठा स्त्री या विषयांवर चर्चासत्र होईल. यात विचारवंत, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात प्रा. ज्ञानेश वाकुडकर व परभणीचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुख्य उपस्थितीत कविसंमेलन होईल.