Monday, November 9, 2009

अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाला नख लावू नका - गायधनी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 23rd, 2009 AT 10:05 PM

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह - पाचव्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना, संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव, बाळासाहेब लुंगे, आमदार रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, डॉ. साहेबराव खंदारे व इतर मान्यवर. (सकाळ छायाचित्रसेवा)

नागपूर - लेखक किंवा साहित्यिकाने अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाला नख लावणारे लेखन करु नये, अशी प्रतिक्रिया पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्‍त करीत डॉ. आनंद यादव यांच्या लेखनाचा समाचार घेतला. साहित्य केवळ वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी किंवा वाद निर्माण करण्यासाठी नव्हे, तर वास्तववादाला हात घालून समाजाला दिशा दाखविणारे असावे, अशी अपेक्षा त्यांनी बहूजन लेखकांकडून व्यक्‍त केली.
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते शनिवारी थाटात उद्‌घाटन झाले. विचारपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, चिखलीच्या आमदार रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर विभागाच्या सहआयुक्‍त पल्लवी दराडे, चौथ्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेबराव खंदारे, मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ठुबे, संभाजी ब्रिगेडचे अनंतदादा चोंदे, देवानंद कापसे, नितिन सरदार, पुरुषोत्तम कडू, इतिहासकार मा. म. देशमुख, सुमतीताई धनवटे, टी. टी. ठाकरे, विजयकुमार शिंदे, विभागीय अध्यक्ष मधूकर मेहकरे, शारदा देशमुख आदी उपस्थित होते.
महाकवी गायधनी म्हणाले, आज साहित्यिकांना सत्य दिसत नाही ही खेदाची बाब आहे. त्यांना जबाबदारीची जाणीव होईल, तेव्हाच खऱ्याअर्थाने समाज परिवर्तन घडेल. कारण साहित्यिकांमध्ये समाजातील प्रत्येक वाईट गोष्टी बदलविण्याची ताकद आहे.
मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करीत
श्री. गायधनी म्हणाले, मराठा समाज मनाने उदार आहे. म्हणूनच त्यांनी सर्वांना आपले मानून जवळ केले. या समाजाने जाती, पंथ किंवा धर्माला चिकटून राहण्याचा संकुचितपणा कधीही दाखविला नाही. दलितांनी एकसंघ राहून आपला विकास करवून घेतला. मराठा समाजानेही त्यांच्यापासून धडा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. गायधनी यांनी इतरही विषयांना हात घातला. त्यांनी शालेय अभ्यासक्रमात तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्याचे शिकविले जात असल्याबद्‌दल आश्‍चर्य व्यक्‍त करीत, अभ्यासक्रमातून ते काढून टाकण्याची मागणी केली. नागपूर विद्‌यापीठाबद्‌दल उच्चारण्यात येणाऱ्या "आरटीएम' किंवा "रातुम' या शब्दांवरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी आपल्या विवेचनपूर्ण भाषणात बुवाबाजीवरही टिका केली. जगात कोणतीही दैवी शक्‍ती नसल्याचे सांगून, महिलांना आसारामबापूंसारख्या बुवांकडे न जाण्याची विनंती केली. बोलीभाषेत मोठे सामर्थ्य असल्याचे सांगून, त्यांनी राज्यात बोलीभाषा विद्‌यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली.
संमेलनाचे उद्‌घाटक शिवराज महाराजांनी परखड मत व्यक्‍त करीत, दैनंदिन जीवनात घडणारे अनेक किस्से ऐकविले. त्यांच्या भाषणाने सर्वाधिक टाळ्या तर घेतल्याच, शिवाय साहित्यासारख्या जड विषयाने गंभीर झालेल्या वातावरणात हास्यही फुलविले. या निमित्ताने मराठा समाजाला संत तुकारामांची आठवण होणे व राज्यातील समाजबांधव एकत्र येणे, हे संमेलनाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. पैशाच्या मागे लागलेल्या आजच्या ढोंगी साधुसंतांवरही त्यांनी प्रहार केला. संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर हेच खरे संत असून, त्यांची शिकवण आत्मसात करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
डॉ. खंदारे यांनी मराठी साहित्य व मराठा साहित्य यातील फरक सांगून, मराठी ही प्रशासनाची भाषा व्हावी अशी इच्छा व्यक्‍त केली. वाङमयाची निर्मिती साहित्याचा शोध घेण्यासाठी झाली असून, अशाप्रकारची संमेलने त्यादिशेने महत्वाचे पाऊल ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. बाळासाहेब लुंगे यांनी साहित्यिकांना प्रामाणिक व निकोप राहून लेखन करण्याचा सल्ला दिला. प्रामाणिक नसलेल्या लेखकांचे साहित्य फसवे असते, असे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ना. गो. थुटे, प्रा. अशोक राणा आणि दिलीप धापके यांच्याही पुस्तकाचे प्रकाशन झाले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक विजयकुमार शिंदे यांनी केले. संचालन लिना निकम व विजया मारोतकर यांनी केले, आभार सुरेखा कापसे यांनी मानले. डॉ. विजया कोकाटे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. कार्यक्रमाला गंगाधरराव पन्नासे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्ञानेश्‍वर रक्षक, दादासाहेब ठाकरे, प्रा. प्रभाकर पावडे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

No comments: